Monday, 28 August 2023

नातं

                                                                         नातं 


वही आणि लेखणीचं नातंच खुप गोड आहे. निरपेक्ष, निर्विवाद, निःशंक आणि निस्वार्थी. त्या दोघांच्या एकमेकांकडून फार अपेक्षा नसतात. अपेक्षा नसल्यावर अतिशय समाधानी आणि सुखद जगता येतं. जगण्याचा खरा आनंद घेता येतो. निखळ वाहणारा झरा खूप काही सांगून जातो. खाचखळग्यातून वाट कशी काढावी  हे शिकवून जातो. मी कधीच हे शिकू शकले नाही. न धरून ठेवता आले, न सोडून देता आले. एखाद्या चिंधी सारखं. चिंधीचं असच असतं. ज्या कारणासाठी तिला तिच्या कापडाच्या ताग्यातून वेगळं केलेलं असतं, त्याच कारणाची गरज संपली कि, तिची हि गरज संपते. मग त्या एवढ्याश्या चिंधीचा भार वाटू लागतो.


कधी कधी तर मला असं वाटतं कि पिसं लावून उडून जावं. म्हणजे झेप घ्यावी असे नाही. भरारी, उडी, झेप हे आणि यासारखे शब्द मला आता प्रेरणा देत नाहीत. आधीसारखे. आता मला खुणावते ते स्वच्छंद, मोकळे, खुले आकाश. "आभाळ" या शब्दापेक्षा "आकाश" हा शब्द मनाला अतीव भिडतो. आकाश हे शुभ्र, स्वच्छ आणि ताजे वाटते. पण आभाळाचं तसं नसतं. आभाळाचं ओझं वाटतं. ढग अगदी खाली येऊन, काळजावर घाव केल्याचा भास होतो. मनाचे खेळ सारे ... दुसरे काय?


खरं म्हणजे ढग हा धरणीला भिजवण्यासाठी खाली उतरून येतो. तो साथ द्यायला आलेला असतो. घात करण्याचं त्याच्या मनातही नसतं. शेवटी तो हि त्याचं आभाळ सोडूनच आलेला असतो न? धरणीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी! एखाद्याने अपेक्षा पूर्ण केल्यावर किंवा करताना शाब्बासकीची थाप खूप काही करून जाते. त्याला नवे बळ देते, नवी उम्मेद देते, एक आशा पल्लवित करते. पण हे नेहमीच होते असे नाही. कधीतरी, निराळेच घडते. आपल्याला वाटते कि आज सगळंच कसं छान आहे, सगळं निर्विघन, स्वच्छ, मोकळं आहे. पण घडतं मात्र भलतंच. बघता बघता आपल्याला आशा, आकान्गशांवर पाणी फिरतं आणि सगळंच मातीमोल ठरतं. आपण दिलेला वेळ, केलेले कष्ट, उराशी बाळगलेल्या आशा, जीव ओतून काम करताना झालेली जखम. जेव्हा आपल्या आनंदाच्या आशेच्या ओघात ती जखम जाणवलेलीच नसते. तिची ठिणगी आपल्याला खूप लहान, सूक्ष्म आणि क्षुल्लक वाटते. पण तेच निराशेचे पाणी फिरल्यावर त्या ठिणगीची आग भडकू लागते. विचारांच्या काहुराचा वारा त्या आगीला अजूनच भडकवत असतो. आपण हे सगळं कुणासाठी केलं ? का केलं ? या प्रश्नांची आपण नकळत उत्तरे शोधत बसतो. उत्तरं सापडत नाहीत, प्रश्न पडतच राहतात. निर्धार करावासा वाटतो. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून या जाळ्यातून स्वतःला सहज सोडवता येईल, असेही मला वाटू लागते. मन बरेच काही मनाशीच ठरवते. चंग बांधते, हिशेब आखते. काय काय करते हे मन? इमले बांधते. वास्तवाच्या गलक्यात पुन्हा ते सगळे इमले पडतात. 

तेवढ्यात माझे लक्ष्य एका गोष्टीकडे वेधले जाते. मी निराशेने इतकी काठोकाठ भरलेली असताना. एक चिमणा चिमणीची जोडी मला दिसते. ती घुटमळत असतात. त्यांचं घरटं मोड्लेलं असतं. आणि मला तो whatsapp वर आलेला मेसेज आठवतो, ज्यात चिमणा चिमणीला म्हंटला होता कि, "अगं, चल आपल्याला पुन्हा नवीन घरटे बांधावे लागेल.. मदतीची वाट पाहायला आपण माणसं थोडेच आहोत" आणि मी सगळी निराशा झटकून पुन्हा नव्या उम्मेदीने उभी राहते. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो, एक महत्वाचा धडा तो आपल्याला देतो आणि तो म्हणजे, "प्रयत्नांती परमेश्वर!" "तू चाल पुढं तुला र गड्या.. भीती कश्याची... पर्वा बी कुणाची ?"

4 comments:

  1. लिखाण खूपच सुंदर आणि भिडणारे आहे 😊👍🏻मनःपूर्वक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. खूप छान आहे लिखाण

    ReplyDelete
  3. अप्रतिम

    ReplyDelete
  4. खूप सुंदर

    ReplyDelete